औरंगाबाद: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेना-भाजप युतीचे सूत्र घालून दिलं होतं. त्याच सूत्राप्रमाणे शिवसेनेने जावं आणि जनमताचा आदर करायला हवा होता अशी आमची इच्छा आहे. असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत सांगितलं.
दानवे म्हणाले जर बाळासाहेब आज असते, तर हे घडलंच नसतं. भाजप शिवसेना युतीचे जनक बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आहेत. 1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते. त्यावेळी शिवसेनेकडून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि भाजपचा उपमुख्यमंत्री झाला. असेही दानवे यावेळी म्हणाले. भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढली होती.
भाजप शिवसेनेने महाजनादेश यात्रा काढल्यानंतर आमच्या आघाडीला जनतेने बहुमत दिलं. या बहुमताचा आदर दोन्ही पक्षांनी केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चांगला कारभार झाला आहे. त्यामुळे नेतृत्व बदलायचं काही कारण उद्भवत नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे कोणी कितीही बोललं तरी नेतृत्वात बदल होणार नाही असेही रावसाहेब दानवे यांनी ठणकावून सांगितले.