मुंबई: औरंगाबादमध्ये कचरा टाकण्यासाठी विरोध करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला करुन घरात घुसुन मारले होते. त्यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणी विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत औरंगाबादचे पोलिस आयुक्त यांच्यावर कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची घोषणा केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
आज सकाळपासून विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी महापालिका व पोलीस आयुक्तांना जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता.
आज सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील प्रत्येक प्रभागात त्या त्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा पर्याय यावेळी अजितदादांनी सुचवला. तसेच कचराप्रश्नावरून झालेल्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेला लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते. याठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.
कचरा प्रकरण: पोलिस आयुक्त ‘यशस्वी’ यादव सक्तीच्या रजेवर!
RELATED ARTICLES