मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येणारं आहे. पाच वर्ष स्थिर आणि पर्यायी सरकार देण्यावर तिन्ही पक्षाचा भर असून आम्ही आज रात्री किंवा उद्या शनिवारी सकाळी सत्तास्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
राज्याचा आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतलं जाणार आहे का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी तिन्ही पक्षांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार पाच वर्ष चालावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांच्या भावनेचा सन्मान झाला पाहिजे. लवकरात लवकर सरकार स्थापन करणं याला आमचं सर्वाधिक प्राधान्य आहे, असंही ते म्हणाले. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचा लक्ष या महाविकास आघाडीकडं लागलं आहे.