मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी. अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी भर दिला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असे मिलिंद देवरा यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करीत आहे. मात्र काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी. केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असे मिलिंद देवरा यांचे म्हणने आहे.
मिलिंद देवरा हे राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे देवरा यांच्या मागणीवर सोनिया गांधी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता.