मुंबई: देश गंभीर संकटात असताना सर्वांना पकोडे- भजी या चर्चेत गुंतवून ठेवायचे व काश्मीरात जवानांनी रोज शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली असून काश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी भारताची नाडी काश्मीरमध्ये रोज सोडत असून त्यामुळेच तिरंग्यास मान खाली घालावी लागते, असे शिवसेनेने म्हटले आहे.
जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहे. सीमेवरील घटना या बलाढ्य देशाला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. देशात पकोडे व भजी तळण्यावर राजकीय चर्चा सुरु आहे. पाकला चोख उत्तर देऊ असे रोज सरकारच्या वतीने सांगितले जाते. मग सरकारला अजून उत्तर सापडत नाही का?, काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकल्याचा आरोप करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले का?, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले का?, असे प्रश्नच शिवसेनेने सरकारला विचारले आहेत. देशातील गंभीर प्रश्नांवरून लक्ष उडावे यासाठी वैचारिक पकोड्यांचे तळणे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा पराभव करून फाळणी केली. त्यावेळी अमेरिका भारताविरोधात पाकच्या बाजूने होती. आता अमेरिकेसह बहुसंख्य देश मोदींच्या तालावर नाचतात असे सांगितले जाते. पण परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही, असे शिवसेनेने नमूद केले.