सांगली : माजी मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीत मोठा बदल करण्यात आला. जयंत पाटील हे अभ्यासू आणि चांगले वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
अभ्यासू, मुरब्बी राजकारणी आणि दीर्घकाळ मंत्री, अशी ओळख जयंत पाटील यांची आहे. मुळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावचे असणारे जयंतराव पाटील हे गेली २५ वर्षे वाळवा-इस्लामपूर मतदार संघाचे विधानसभेत नेतृत्व करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री अशी महत्वाची खाती जयंत पाटील यांनी सांभाळली आहेत. त्याचबरोबर गेल्या ३ वर्षांपासून विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्याची जबाबदारी जयंत पाटील पार पाडत आहेत.
आता पक्षाने त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीने जिल्ह्याला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. या आधी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेसशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात घवघवीत यश मिळवले होते. राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून नावारूपास आणले होते. आता जयंत पाटील यांच्या रूपाने पुन्हा जिल्ह्याला प्रदेशाध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव चैतन्याचे वातावरण पसरले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीमुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर या निवडीचे जिल्हा राष्ट्रवादीकडून आतषबाजी करून नागरिकांना पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.