नागपूर – साकीनाका आगप्रकरणी माहिती देताना स्थानिक आमदार नसीम खान यांनी मुंबई महापालिका सर्वच विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने या महापालिकेचे तीन विभाग करावेत, अशी मागणी केली. त्यावर आमदार आशिष शेलार यांनी खान यांच्या भूमिकेला तीव्र विरोध केला.
मुंबई मिळवण्यासाठी शेकडो हुतात्मा झाले आहेत, ही मागणी म्हणजे हुतात्म्यांचा अवमान असल्याचे शेलार यांनी म्हटले. सभागृहात हा गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खान यांची बाजू घेत, वाढत्या शहरांमुळे असे विभाजन करणे आवश्यक झाले असल्याची भूमिका मांडली. या मागणीमध्ये काहीही वादाचा विषय नाही. मात्र याला वेगळे स्वरूप दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिकाही दोन विभागात आणण्याबाबत आम्ही विचार करत होतो, असेही पवार यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान वाढत्या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.