मुंबई – सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगली गेली नाही तर काय होऊ शकते हे चेंबुरमध्ये घडलेल्या घटनेने समोर आले आहे. फेसबुकवर तरुणीच्या नावाने फेक अकाऊंट बनवून एका तरुणाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्या तरुणासोबत जे घडले ते थक्क करणारे आहे.
चेंबूरच्या माहूल गावातील गव्हाणपाडा परिसरात राहणाऱ्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. हितेंद्र यांना ८ जानेवारीला फेसबुकवर एका अनोळख्या मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांचेही फेसबुक मेसेंजवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर हितेंद्र यांना या मुलीने गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलवले. या मुलीने बोलवलेल्या ठिकाणावर हितेंद्र वेळेत हजर झाले. तिथे गेल्यावर त्यांना एका मुलीने हात दाखवून तिच्याकडे बोलवले. आपण ज्या मुलीशी रोज फेसबुकवर बोलतो ही तिच मुलगी असल्याची समजुत झाल्याने हितेंद्र त्या मुलीच्या जवळ गेले.
हितेंद्र त्या मुलीजवळ जाताच ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्यांना लोखंडी रॉड आणि स्टम्पने जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील ५ लाख ९२ हजारांचा ऐवज घेऊन ही टोळी पसार झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर हितेंद्र यांच्या तक्रारीवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला असता या प्रकरणाला वेगळे वळण लागले. तक्रारदार तरुणाने काही दिवसांपुर्वी आरोपीच्या काकावर पार्किंगच्या वादातून हात उगारला होता. याचा बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीचे फेक अकाऊंट बनवून हितेंद्र यांच्याविरोधात हा कट रचल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.