राज्यातील सत्तासंघर्षावरून कोण काय बोलतं यावर मी किंवा भाजपाकडून कुणी काही बोलणार नाही. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दि्ल्लीत माध्यमांशी बोलताना दिली. यामुळे युतीमधील पेच कायम आहे.
सत्ता स्थापनेवरून कोण काय बोलतंय त्यावर मी बोलणार नाही. परंतु राज्याला नवीन सरकार स्थापन करण्याची गरज आहे. असेही फडणवीस म्हणाले. मात्र त्यांच्या चेह-यावर तणाव कायम होता. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ‘मी पुन्हा येईल’ असा प्रचार केला होता. मात्र आता निकालानंतर फडणवीस पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार असं आत्मविश्वासाने बोलताना दिसत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सत्तासंघर्षावरून तोडगा काढण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. परंतु, शाह हे फडणवीसांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्यामुळे कोणताही तोडगा निघाला नाही. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अकरा दिवस उलटूनही युतीमधील सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आमच्याकडे 175 आमदर आहेत. जर भाजपाकडे बहुमत असेल तर त्यांनी सत्ता स्थापन करावी असे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहे. यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.