मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर २७ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ईडीनं या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला त्यावर कोर्टानं आजची सुनावणी तहकूब करत पुढे ढकलली. भुजबळ यांचे पुतणे आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनीही हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
भुजबळांच्या वतीनं ते निर्दोष असल्याचा पुनरूच्चार करत सुप्रीम मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम ४५(१) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणंय. गेले २१ महिने आपण जेलमध्ये आहोत, पासपोर्ट ईडीकडे जमा आहे, त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्या वतीने कोर्टाला करण्यात आली होती. मात्र पीएमएलए कोर्टाने भुजबळांचा जामीन अर्ज फोटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्यानं अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसंच मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.