मुंबई: भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून मंगळवारी संतप्त नागरिकांनी चेंबूर येथे बेस्टच्या आठ बसेसची तोडफोड केली. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तोडफोडीमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त आंबडेकरी अनुयायांकडून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती ती आता सुरळीत झाली आहे. जीआरपी पोलीस आणि आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरेगावात भीमाच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने ऐतिहासिक विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.