मुंबई : पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना पाहता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. मनसेच्या मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांना राज ठाकरेंनी ‘कृष्णकुंज’वर बोलावून घेतले आहे. या बैठकीत सर्व विभाग अध्यक्षांना फेरीवाल्या विरुध्द आक्रमक होण्याचा डोस मिळण्याची शक्यता आहे.
विक्रोळीत मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची विभाग अध्यक्षांसोबतची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज ठाकरे या हल्ल्यांबाबत काय भूमिका घेतात आणि पुढील वाटचाल काय ठरवतात, हे या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात राज ठाकरे स्वत: मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेची पुढील भूमिका काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.