मुंबई- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्षे झाल्यानिमित्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी मुंबई येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज ज्या प्रकारे दहशतवादी हल्ले होत आहेत, त्यांना रोखण्यासाठी नागरिकांनाही जागरुक रहावे लागेल. कोणीही अचानक गर्दीमध्ये वाहन घुसावतो. अचानक फायरिंग केली जाते. या घटनांना रोखण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे डोळे, कान होण्याची गरज आहे.’
मुंबईत कडेकोट बंदोबस्त
या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुंबई पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यादृष्टीने शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचे नियोजन सरकार करत आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे पुरेसे नसून यासाठी आणखी प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.