नागपूर – संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे दोघांवरही अजामिनपात्र गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराला जबाबदार आहेत, असे असतानाही सरकार त्यांना अटक करत नाही. सरकार या दोघांपुढे झुकले आहे, अशी जहरी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचा अधिकार नाही, याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
भारतात दोन प्रकारच्या हिंदू संघटना आहे, त्यातली एक संघटना लोकांमध्ये जाते, तर दुसरी आपले मत लोकांवर लादत असते. ही दुसरी संघटना आता हिंसाचारावर उतरली आहे आणि हिंदूंनाच मारण्यास सुरुवात केली आहे. भारतात प्रत्येक राज्यात अशाप्रकारचे हाफिज सईद आहेत, असा घणाघात आंबेडकर यांनी केला.
कोरेगाव भीमा प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप ही समिती नेमण्यात आली नाही, असेही आंबेडकर म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर पहिल्यांदाच नागपुरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते नागपुरात आले आहेत.