महत्वाचे…
१.बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. २. बोन्ड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा ३. कापूस पीक वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला
औरंगाबाद: बोन्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत असून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड,माजी आ. कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील जालना रोड वरील केम्ब्रिज शाळे समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनानंतर निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या कंपन्यांनावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी आ. अब्दुल सत्तार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करमाड पोलीस ठाण्यात ठिया मांडला.
या आंदोलनात बोन्ड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. दुधाला ३० रुपये लिटर भाव मिळालाच पाहिजे. महागाई कमी झालीच पाहिजे.शेतकऱ्यांना वीजबिल माफ झालेच पाहिजे अशा विविध मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. यावेळी आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी.आ.कल्याणराव काळे, माजी.आ.नामदेवराव पवार यांच्यासह रवींद्र काळे, विनोद तांबे, रामुकाका शेळके, सरोजताई मसलगे, जितेंद्र देहाडे,डॉ पवन डोंगरे,धनराज बेडवाल,किरण डोंणगावकर,प्रभाकर मुट्ठे, रामदास पालोदकर, राजुमिया देशमुख, अतिष पितळे, आमेर अब्दुल सलीम, राहुल सावंत, अकील पटेल आदींसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करतो. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मका पीक हाती आले नाहीं. त्याच बरोबर कापूस पिकाला बोन्ड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे. भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीचा कोणत्याच शेतकऱ्याला लाभ न मिळाल्याने व कापूस पीक वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले अशी माहिती माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांनीं दिली.