मुंबई – भाजपला गुजरातची निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध वाटत होती. मात्र राहुल गांधींनी गुजरातमध्ये ज्या पद्धतीने आक्रमक प्रचार केला, त्यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींची चांगलीच दमछाक झाल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानामधून उद्धव यांनी राहुल यांचे कौतुक करताना भाजपवर मात्र वार केला आहे. शिवाय राहुल हे नेतृत्व करण्यास सक्षम झाले असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.
काही वर्षापूर्वी पप्पू म्हणून हिणवले गेलेले राहुल गांधी गुजरात निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरले आहेत. मॅन टू वॉच या पद्धतीने त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गुजरात निवडणुकीचे निकाल काही लागो मात्र राहुल यांच्या बदललेल्या आविष्कारापुढे मोदी आता राहुल यांना आपले प्रतिस्पर्धी मानू लागले आहेत, असे मत उद्धव यांनी मांडले आहे. ईव्हीएम मशीन हीच भाजपच्या विजयाची मोठी ताकद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधींच्या मंदीर भेटींचेही कौतुक करताना उद्धव यांनी त्यांच्या सौम्य हिंदूत्वाचे स्वागत केले आहे. काँग्रेसला राहुल सौम्य हिंदूत्वाच्या दिशेने नेत असतील तर संघाने राहुल यांचा सत्कार रेशीमबागेत करावा, असा सल्लाही उद्धव यांनी संपादकीयमधून दिला आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. पण त्यावर मोदी औरंगजेबाची राजवट असल्याची टीका करत आहेत. औरंगजेबाच्या राजवटी विषयी जर मोदींना येवढाच तिटकारा असेल तर महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेब आणि अफजल खानाच्या कबीर खणून काढण्याचे आदेश त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत, असे आव्हानही उद्धव यांनी दिले आहे.