औरंगाबाद: भाजपाकडून निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ‘अच्छे दिन’ या घोषणेचा नेहमीच प्रभावीपणे वापर करण्यात आला. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेली महागाई आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधक सरकारला सातत्याने लक्ष्य करत आहेत. औरंगाबादमध्ये सोमवारी काँग्रेसमधून अनोख्या पद्धतीने सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पेट्रोल पंपावर वाहनधारकांना चॉकलेटस वाटली. यावेळी या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्क लावला होता.
देशभरात डिझेल, पेट्रोलची सातत्याने दरवाढ करून सामान्य नागरिकांना महागाईच्या दरीत ढकलण्याचे काम सरकार करत आहे. ‘अच्छे दिन’ येणार हा खोटारडेपणा आहे. सरकारने फक्त ‘अच्छे दिन’चं चॉकलेट दिले असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने मोदींचा मास्क लावून हे अनोखे आंदोलन केले. शहरातील बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, शहागंज, तसेच दिल्ली गेट येथील पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी दुचाकी चालकांना चॉकलेटस वाटली.
काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ‘अच्छे दिन’साठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन जाहिरातींमधून करण्यात आले होते. मात्र, सध्या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरत आहे. सध्याची परिस्थिती पाहता ‘लौटाओ हमारे बुरे दिन’ म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला.