Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्र'मायावतींनी घोषणा करू नये, बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी- आठवले

‘मायावतींनी घोषणा करू नये, बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी- आठवले

मुंबई – बसपच्या प्रमुख मायावती या जेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हाच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला हवी होती. मात्र, त्या अनेक वर्षांपासून बौद्ध धम्माची दीक्षा घेणार, अशी केवळ घोषणाच करीत आहेत. प्रत्यक्ष मात्र त्या धम्म दीक्षा घेत नाहीत. मायावती या खऱ्या आंबेडकरवादी असतील तर त्यांनी घोषणाबाजी करून बौद्धांची दिशाभूल करण्यापेक्षा त्वरित बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.

मायावतींनी नुकतेच नागपुरात जाहीर सभेत बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा इशारा हिंदुत्ववाद्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मायावतींनी केवळ घोषणा करणे थांबवून त्वरित हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे आवाहन केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा करून कर्मठ हिंदुत्ववाद्यांना इशारा दिला होता. हिंदू धर्मात दलितांना न्याय मिळणार नसल्याची डॉ. बाबासाहेब अंबेडकरांची खात्री झाल्यानेच त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याप्रमाणे आम्ही लाखो दलित बौद्ध झालो. मायावती मात्र अजून बौद्ध झाल्या नाहीत.

कर्मठ हिंदुत्ववाद्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मात सुधारणा करण्याची संधी दिली होती. मात्र, ती सुधारणा होऊ शकत नसल्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खात्री झाल्यानेच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मग, मायावती आता पुन्हा कसली संधी हिंदुत्ववाद्यांना देत आहेत. मायावतींनी डॉ. बाबासाहेबांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने चालावे, असे आवाहन ना. रामदास आठवलेंनी केले आहे.
यापूर्वी मायावतींनी त्या जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ, असे जाहीर केले होते. आता हिंदुत्ववाद्यांनी अत्याचार थांबविले नाही तर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ, असा मायावतींनी इशारा दिला आहे. मात्र, हा इशारा फसवा ठरणार आहे. खरेतर हिंदू धर्मातील सर्वच दलितांनी अत्याचार रोखण्यासाठी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेणे गरजेचे आहे, असे मत रामदास आठवलेंनी व्यक्त केले आहे.
मायावती या जर खऱ्या आंबेडकरवादी असतील तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म आणि राजकारणात रिपब्लिकन पक्षाचे काम करावे, असे आवाहन रामदास आठवलेंनी मायावतींना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments