मुंबई: धुक्यामुळे हिवाळी वेळापत्रकात मध्य रेल्वे बदल करणार होती. पण प्रवाशांच्या दबावामुळे मध्य रेल्वेनं आपलं हिवाळी वेळापत्रक अखेर मागे घेतलंय. आता कसारा आणि कर्जत मार्गावरच्या सीएसटीकडे येणाऱ्या लोकल वेळेच्या १५ मिनिटं आधी सुटणार नाहीत.
ओखी’ वादळानंतर मुंबई उपनगरात धुक्याने आच्छादली होती. यामुळे रेल्वेसेवा बाधित झाली. रेल्वे रुळावर कमी दृष्यमानतेमुळे लोकल अतिशय संथ गतीने धावत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जत मार्गावरील काही फेऱ्यांच्या वेळेत बदल केला. काही लोकल वेळेपेक्षा १५ मिनिटं आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे प्रवाशांचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागला. यामुळे प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची सोमवारी भेट घेतली. प्रवासी संघटनांचा आक्रमकपणा पाहून, मंगळवारी सायंकाळी हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याची घोषणा केली. २१ डिसेंबरपासून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.