मुंबई- ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांचं निधन झालंय. वयाच्या 85 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. सुधा करमरकर याचनी बालरंगभूमीसाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्या लिटिल-थिएटर संस्थेच्या संस्थापक होत्या तसंच त्याची अनेक नाटकंही गाजली आहेत.
सुधा करमरकर यांचं मूळचं घराण गोव्याचं होतं. पण त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील तात्या आमोणकर हे गिरगांव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधा करमरकर यांना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू मिळालं होतं. त्यांच्या वडिलांनी त्यांना व त्यांची बहीण ललिता या दोघींना गाणं आणि नाट्य शिकायला पाठवलं होतं. सुधा करमरकर त्या काळात पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये दाखल केले गेले, आणि त्यानंतर नृत्यशिक्षक पार्वतीकुमार यांच्या हाताखाली नृत्यशिक्षण घ्यायला लावले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात प्रवीण झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी. ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात काम केलं. नाटकामध्ये त्यांनी रंभेचीच भूमिका साकारली त्यांची ती भूमिका खूप गाजली.
सुधाताईंनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर, दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये (त्यांच्या नाटकातून काम करण्यासाठी) दाखल करून घेतले. त्यावेळी भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित ‘उद्याचा संसार’ हे नाटक सादर केलं. त्या स्पर्धेत, सर्व नाटकांमधून निवड होऊन सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधा करमरकरांना मिळाले.
अधिकचे नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटकं पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले. सुधाताई मायदेशी परतल्या आणि सगळी परिस्थितीच बदलली. त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने ‘बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरू केलं. सुधाताई यांनी लिटिल थिएटरतर्फे मोठय़ा प्रमाणात बालनाटय़ व प्रौढ नाटय़ प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली. या शिबिरांमधून अनेकांनी सुधाताई यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरविले. अशा प्रशिक्षण शिबिरातून मुलांमधील सुप्त अभिनय कलागुणांना योग्य वळण मिळते. मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील कलाकार घडतो, विकसित होतो असा विश्वास त्यांना विश्वास होता.