नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह काँग्रेस व इतर विरोधकांना नेहमीच तुकडे-तुकडे गँग असा उल्लेख करतात. गुरुवारी अमित शाह यांनी असाच उल्लेख केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून सध्या केंद्रात तुकडे-तुकडे गँग सत्तेत आहे असा टोला लगावला आहे.
अमित शाह यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना तुकडे-तुकडे गँगला अद्दल घडवा असं आवाहन दिल्लीतील जनतेला केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग दिल्लीत अशांतता पसरवत असून, तिला अद्दल घडवा”.
The Tukde Tukde Gang is currently in power at the Centre.
— Tushar (@TusharG) December 27, 2019
‘‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (CAA) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे,’’ असे अमित शाह म्हणाले होते.