दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहू शकल्या नाही. मात्र, त्यांनी उध्दव ठाकरेंना पत्र पाठवून शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार राज्यावर आलं आहे. या सोहळ्याला सोनिया गांधींनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्या या सोहळ्याला हजर राहू शकणार नाहीत. त्यांनी पत्र पाठवून या संदर्भातली माहिती दिली आहे.
सोनिया गांधींनी काय म्हटलं पत्रात..
प्रिय उद्धवजी,
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी माझी भेट घेतली आणि तुमच्या शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं. मुंबईत येणाऱ्या या सोहळ्याला मी येऊ शकत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष अशावेळी एकत्र आले आहेत ज्यावेळी भाजपा दहशत पसरवत आहे. सध्याची देशातली राजकीय स्थितीही चांगली नाही. अर्थव्यवस्था कोसळली आहे. शेतकऱ्यांना या सगळ्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रात चांगला कारभार चालेल याची मला खात्री आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं आहे. लोकांनीही महाविकास आघाडी स्वीकारली आहे. लोक आपल्याला साथ देतील असाही विश्वास मला वाटतो. आपल्या सगळ्यांचे प्रयत्न जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहात याचा आनंद आहे. त्यासाठी शुभेच्छा!
सोनिया गांधी
अध्यक्षा, काँग्रेस
हे पत्र पाठवून त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सक्षम सरकार चालवा असंही आवाहन केलं आहे.