नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शरद पवार नरेंद्र मोदींशी आज चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
“राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. शरद पवार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातचं पीक गेलं आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरातही पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.
शरद पवार यांनी १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानाची माहिती शरद पवार केंद्र सरकार आणि संबंधित मंत्र्यांना देणार असून लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत. यामुळे सर्व शेतक-यांचे शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीकडे लक्ष लागले आहे.