नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची 26 मार्चला होणा-या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
देशभरात रेल्वे, विमानसेवा, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कंपन्यांमधील कर्मचा-यांनाही वर्क फ्रॉर्म होम काम करायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसभेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अनेक महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता राज्यसभा निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.
या राज्यांच्या जागांसाठी होणार होतं मतदान…
राज्यसभेच्या 18 जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार होतं. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपुर, मेघालय, आंध्र प्रदेश आणि झारखंड या 7 राज्यांतील 18 जागांसाठी मतदान होणार होतं. परंतु ते लांबणीवर पडला आहे.