नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपासाठी ‘अच्छे दिन’ असल्याचा टोला चिदंबरम यांनी लगावला.
चिदंबरम म्हणाले, अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार दिशाहीन आहे. देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. मात्र, यासाठी कारणीभूत ठरलेल्या आपल्या चुका स्विकारण्यापेक्षा त्यावर अजब तर्क लढवले जात आहेत. देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपासाठी ‘अच्छे दिन’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. मागील विकास दराचा उल्लेख करताना ५ टक्के विकास दर देखील विश्वासदर्शक नसल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारमध्ये अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता नाही. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये आहे मात्र देशाला आता यासाठी वाट पहावी लागणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरकारकडून कोणत्याही उपाययोजना नाही…
देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. यासाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. सरकारने याबाबत हट्टी भूमिका घेतली आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि कर दहशतवादामुळे देशाची अर्थव्यवस्था सध्या आपल्या वाईट काळातून चालली आहे. या सरकारने अच्छे दिन आणण्याचा दावा केला होता. मात्र, मी तुमच्यासमोर गेल्या सहा महिन्यांचे आकडे ठेवतो. या आकड्यांनुसार, विकास दर ८ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर, त्यानंतर ६.६ पुढे ५.५ त्यानंतर आता ४.५ टक्के असा घसरत गेला आहे. हेच सरकारचे अच्छे दिन आहेत का? असेही चिदंबरम म्हणाले.
हे कसले अच्छे दिन…
हे कसले अच्छे दिन हे विचारताना चिदंबरम म्हणाले, “जर वर्षाच्या शेवटी विकास दराने ५ टक्क्यांना स्पर्श केला तर आपण स्वतःलाच भाग्यवान समजू. देशाचे मोठे अर्थशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी जीडीपी ५ टक्के राहिल असा इशाराही यापूर्वी सरकारला दिला होता. मात्र, आता स्थिती त्यापेक्षाही खराब बनली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यावर मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर आपल्या मंत्र्यांना त्यांनी खोटं बोलण्याची सूट दिली आहे.”
काश्मीरबाबत बोलताना चिदंबरम म्हणाले, काल रात्री ८ वाजता मी तुरुंगातून बाहेर आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर मी काश्मीरमधील त्या ७५ लाख लोकांसाठी प्रार्थना केली ज्यांना ४ ऑगस्टपासून अद्याप स्वातंत्र्य मिळालेलं नाही. काश्मीरातील नेत्यांबाबत मला चिंता वाटत आहे. ज्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय कैदेत ठेवण्यात आले आहे. जर आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत बोलत असू तर आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्याची लढाई देखील लढली पाहिजे. असेही चिदंबरम म्हणाले.