जयपूर – गोहत्या तसेच गो-तस्करी करणाऱ्यांची हत्या होईल, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केले आहे. अलवर जिल्ह्याच्या रामगढ भागात गो-तस्करीच्या आरोपाखाली झाकीर या ४६ वर्षीय व्यक्तीला काही स्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केली. या प्रकाराबद्दल विचारले असता आहुजा यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
गो-हत्येच्या कारणावरून अनेकांच्या हत्या झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर संपूर्ण देशातून टीकेची झोड उठलेली असतानाच भाजप आमदार आहुजा यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही अशा गोष्टी करताच कशाला, गोहत्या किंवा गोतस्करी करणाऱ्यांचे असेच होईल, ते जमावाकडून मार खाऊन असेच मरतील, असे आहुजा यांनी म्हटले आहे. गो-तस्करीच्या आरोपावरून झाकीर याला अटक करण्यात आली होती. त्यावर जमावाने ट्रक अडवून त्याला मारहाण केली, असा झाकीरचा आरोप आहे. मात्र, त्याचा हा आरोप आहुजा यांनी फेटाळला आहे. झाकीरचा भरधाव ट्रक उलटून तो जखमी झाला व जमावाने मारहाण केल्याचा खोटा आरोप करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.