नवी दिल्ली : ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पोकळ ठरला आहे. भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सर्वत्र भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याची टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे. जन आक्रोश रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
देशातील महागाई, बेरोजगारी, धार्मिक हिंसाचार तसेच महिलांवरील वाढते अत्याचाराला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले आहे. देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीसाठी उपस्थित आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधींची ही दिल्लीतील पहिलीच रॅली आहे. कर्नाटकात येत्या १२ मे’ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.