नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर पाकिस्तानशी गुप्त चर्चा केल्याचा आरोप केला होता. निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने अशी मर्यादा ओलांडणे योग्य आहे का, असा सवाल करत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेसने पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत गुप्त बैठक केल्याचा आरोप केला होता. या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री, पाकचे भारतातील उच्चायुक्त, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी उपस्थित होते, असा मोदींनी आरोप केला होता.यावर प्रतिक्रिया देताना चिदंबरम म्हणाले, की निवडणुका जिंकणे एवढे महत्त्वाचे आहे का,की माजी पंतप्रधान व माजी उपराष्ट्रपतींवर आरोप केले जात आहेत. या आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही ट्विटरवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.