नवी दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत मांडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर प्रश्नांची सरबती करत फटकारले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींवर घणाघात करत टीकेची तोफ डागली.
राहुल गांधी म्हणाले, मोंदी यांनी काँग्रेसला प्रश्न विचारण्या ऐवजी राफेल करार, शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार निर्मिती यांची उत्तरे द्यावीत. वर्ष २०१४ पूर्वी मोदी हे काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कार्यकाळाविषयी बोलत होते. पण आता मोदी सरकार चार वर्षांपासून सत्तेत आहे. संसदेतून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ते अजूनही विरोधकांनाच प्रश्न विचारत आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यायला हवी. राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मोदी यांनी यावर उत्तर द्यावे, असेही राहुल गांधी म्हणाले.
लोकसभेत मोदींचे भाषण सुरू होताच तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद नसल्यामुळे तेलगू देसमचे खासदार आक्रमक झाले. घोषणाबाजी थांबत नसल्याने शेवटी नरेंद्र मोदींनी या गोंधळातच भाषण केले. यावेळी त्यांनी काँग्रेसला धारेवर धरले. ७० वर्षांच्या पापाची शिक्षा देश भोगत आहे. काँग्रेसची धोरणे योग्य असते तर आज देशाची प्रगती झाली असती, असेही मोदी बोलताना म्हणाले.