नवी दिल्ली- अण्णा हजारे यांनी अखेर सात दिवसांनी उपोषण मागे घेतलं. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी स्वतःहून अण्णांशी मंचावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अखेर यश मिळालं असून, अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना लिंबू पाणी पाजलं आहे. कृषी अवजारांचा जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणणार असल्याचंही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. तसेच तीन महिन्यांत अंमलबजावणीचं आश्वासन दिलं आहे. लोकपालबाबत कालमर्यादा देण्याची मागणी मान्य केली आहे. अण्णा हजारेंच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केलाय. तसेच अण्णांची जनलोकपालाच्या मागणीसह बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अण्णांच्या मागणीनुसार कृषिमूल्य आयुक्तांच्या स्वायत्तेवर उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सुरू होतं. या उपोषणामुळे अण्णांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना भरपूर पाणी पिण्यासह आरामाचा सल्ला दिला आहे.