दिल्ली – लष्करातील सर्वात जुने सैन्यदल ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’च्या स्थापनेला आज २५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आता वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. तानाजी मालुसरे यांनी याच दिवशी १६७० रोजी सिंहगड काबीज केला होता आणि याच दिवशी मराठा लाइट इंफन्ट्रीची स्थापना देखील झाली होती. मराठा इन्फन्ट्रीच्या नावे आतापर्यंत ४ अशोकचक्रांसह ३२० शौर्य पदके आहेत.
रेजिमेंटच्या २५१ व्या वर्षातील पदार्पणाची सुरुवात दिल्लीत आज होणाऱ्या कार्यक्रमाने होईल. या कार्यक्रमात मराठा लाइट इन्फन्ट्रीची शौर्यगाथा दाखवणाऱ्या ‘व्हिक्टरी अँड व्हेलॉर’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन होईल. मराठा लाइट इन्फन्ट्री ही ब्रिटिश काळापासून ‘लाइट इन्फन्ट्री’ चा दर्जा मिळालेली पहिली रेजिमेंट असून छत्रपती शिवाजी महाराज हे या इन्फन्ट्रीचा आदर्श आहेत.
या इन्फन्ट्रीचे ध्येयवाक्य ‘कर्तव्य, सन्मान, धैर्य’ हे असून ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही युद्धघोषणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धातील गनिमी पद्धत ही या मराठा योद्ध्यांची खासियत आहे. महत्वाचे म्हणजे ही रेजिमेंट नौदलाच्या ‘आयएनएस मुंबई’ युद्धनौकेशी आणि हवाईदलाच्या २० व्या स्क्वाड्रनशी (सुखोई) संलग्न आहे. या रेजिमेंटचे मुख्यालय कर्नाटकमधील बेळगाव येथे आहे.
मराठा लाइट इन्फन्ट्रीची आतापर्यंतची कामगिरी….
मराठा लाइट इन्फन्ट्रीची स्थापना सन १७६८ मध्ये मुंबई बेटांवरील ईस्ट इंडिया कंपनीच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी ‘बॉम्ब शिपाई’ दलाची दुसरी फलटण म्हणून करण्यात आली होती. या इन्फन्ट्रीच्या नावे २ व्हिक्टोरिया क्रॉस (नाईक यशवंत घाडगे व शिपाई नामदेव जाधव-दुसरे महायुद्ध) व ४ अशोकचक्रांसह (कॅ. एरिक टकर, कर्नल एन. जे. नायर, कर्नल वसंत वेणुगोपाळ आणि लेफ्ट. नवदीप सिंग) एकूण ३२० शौर्य पदके व युद्ध पदके आहेत.
गोवामुक्ती व हैदराबाद मुक्तीसह स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक युद्धात मराठा इन्फन्ट्रीने आपल्या शौर्याचा दबदबा तयार केला. याच रेजिमेंटमधील जनरल जे. जे. सिंग हे २००५ मध्ये भारताचे लष्करप्रमुख झाले. याचबरोबर पहिल्या महायुद्धात मोसापोटेमिया आघाडीवरील विजयात मराठा इन्फन्ट्रीचा मोठा वाटा राहिला आहे. दुसऱ्या महायुद्धात दक्षिण आशियाई आघाडी, उत्तर आफ्रिका व इटलीमधील युद्धआघाड्यांवर अजोड पराक्रम केला आहे.