मनामा – सरकार जात आणि धर्मावरुन देशातील नागरिकांत फूट पाडत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. बेरोजगार तरुणांतील आक्रोश सरकार तिरस्कारात बदलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते बहरीन येथे अनिवासी भारतीयांना संबोधित करत होते. काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
पुढील सहा महिन्यांमध्ये तुम्हाला वेगळा काँग्रेस पक्ष पहायला मिळेल. काँग्रेसमध्ये येत्या काळात नव्या नेतृत्वाची फळी उभारण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. तसेच, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेस भाजपचा पराभव करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोजगार निर्मितीचा सरकारचा दावा फोल ठरल्याने भारतातील तरुणांत मोठ्या प्रमाणात अशांती आहे. भारतातील राजकारण एका विचित्र वळणावरुन जात आहे, असेही त्यांनी म्हटले.
ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजीनच्या बैठकीत त्यांनी अनिवासी भारतीयांसमोर आपला देशाविषयीचा दृष्टीकोन मांडला. रोजगार निर्मिती, चांगल्या सुखसोई निर्माण करणे, हा आपला उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.