मद्रास: वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा त्याच्या संपत्तीचा वारस ठरतो, त्याप्रमाणेच वडिलांनी घेतलेलं कर्जही त्यानेच फेडले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. धर्मशास्त्रानुसार वडिलांचे कर्ज फेडणे ही मुलाची नैतिक जबाबदारी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
ए. रविचंद्रन यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. रविचंद्रन यांच्या वडिलांनी घरात नरसिंहन यांना कामाला ठेवले होते. यादरम्यान नरसिंहन यांचा मृत्यू झाला होता. रविचंद्रन यांच्या वडिलांनी नरसिंहन यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली नव्हती. आता रविचंद्रन यांनी ती भरपाई द्यावी, अशी मागणी नरसिंहन यांच्या वारसांनी केली होती. हे प्रकरण चेन्नई हायकोर्टात पोहोचले होते. या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला आहे. न्या. एस. वैद्यनाथन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी निर्णयात धर्मशास्त्राचा दाखला दिला. ‘धर्मशास्त्रात वडिलांचे कर्ज फेडणे ही मुलांची नैतिक जबाबदारी असते. अन्यथा त्यांना पुढील जन्मी त्रास सोसावा लागू शकतो. भगवान रामानेही वडिलांना दिलेलं आश्वासन पाळले होते’, असे नमूद करत हायकोर्टाने नरसिंहन यांच्या कुटुंबीयांना भरपाईचे देण्याचे आदेश रविंद्रन यांना दिले आहेत. नरसिंहन यांच्या पत्नीने १५ वर्षे यावर काही भाष्य केले नाही, मात्र २०१६ मध्ये त्यांनी भरपाईची मागणी केली. आम्ही नरसिंहन यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली होती, असे रविचंद्रन यांनी म्हटले होते.