नवी दिल्ली – जीडीपी घसरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनामुळे भारताचा विकास दर खुंटला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिक सल्लागार आणि आर्थिक तज्ज्ञाचे सल्ले एकूण घेत नाहीत. जन्मजात ”मोदी’नॉमिक्स’ला सल्ल्याची गरज भासत नाही, अशी टीका करून मागील चार वर्षात जीडीपी घसरल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी सांगितले. पंतप्रधानांनी निती आयोग कार्यक्रमामध्ये कृषी व ग्रामिण विकास, बेरोजगारी, उत्पादन आणि आयात क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ आणि जानकार मंडळीची भेट घेतली होती. यानंतर सुरजेवाला यांनी हे वक्तव्य केले. पुढे बालताना सुरजेवाला म्हणाले, की ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीए) आणि आर्थिक क्षेत्रातील हालचाली मंदावल्या आहेत.
जीएसटी आणि नोटबंदी अत्यंत चुकीचा निर्णय आहे, असा आरोप करत एका व्यक्तीने देहरादून येथील भाजपच्या कार्यालयात आत्महत्या केली होती. याचा दाखल देत सुरजेवाला यांनी जीएसटीचा उल्लेख गब्बर सिंग टॅक्स आणि मोदीनिर्मित आपत्ती “नोटाबंदी”ने व्यापारी वर्गाला देशोधडीस लावल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्याच्या मालाला ५० टक्के आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन तर सर्वात मोठी लबाडी होती, अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली.