नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कारभारामुळे व्यथित असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निर्णयांचा विपरीत परिणाम न्यायालयाच्या स्वायत्ततेवर तसेच न्यायदानावर झाल्याचे सांगत याबाबतची नाराजी या न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
देशपातळीवर महत्वाच्या असलेल्या खटल्याचे कामकाज सरन्यायाधीशांनी त्यांच्या मर्जीतल्या खंडपीठांना दिल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. ‘ज्या खटल्यांचे वाटप करताना हे घडले आहे त्याबाबत माहिती देऊन आम्हाला संस्थेला लज्जीत करायचे नाही. मात्र, यामुळे न्यायपालिकेची प्रतिमा काही अंशी मलिन झाली आहे’ असे न्यायाधीशांनी या पत्रात नमुद केले आहे.
न्या.जे.चेलमेश्वरांसह रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात सुरू असलेल्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.