राजस्थान: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर तुरूंगात कैदेत असलेल्या आसाराम महाराजाचे भक्त अजून काही कमी झालेले नाहीत. आसाराम भलेही तुरूंगात असला तरी त्यांचे भक्त आजही त्याची पूजा करताना दिसतात. नुकताच जोधपूरमध्ये अशी एक घटना घडली. जोधपूर न्यायालयासमोर सिक्किम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सुंदर नाथ भार्गव यांनी बलात्कारप्रकरणातील आरोपी आसारामचे पाया पडून नवा वाद निर्माण केला आहे.
न्यायालयात बलात्काराच्या खटल्याची रोज सुनावणी होते. त्यामुळे आसारामला रोज न्यायालयात आणले जाते. शनिवारी याचप्रकरणी आसारामला सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात होते. तेव्हा परिसरात उभे असलेले न्या. भार्गव यांनी मोठ्या सन्मानाने त्यांचे पाय धरले. इतकंच नव्हे तर भार्गव यांच्याबरोबर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनीही त्यांचाच कित्ता गिरवला.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार नंतर भार्गव यांना याप्रकरणी विचारणा केल्यानंतर त्यांनी आपण एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जोधपूर आल्याचे सांगितले. सुनावणीसाठी आसाराम यांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे मला कळाल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी न्यायालयात गेलो, असे म्हटले. आसाराम बापूला याबाबत विचारले असता, त्याने भार्गव हे माझे भक्त असून अनेक वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. त्यांना मला भेटायचे होते. त्यासाठी ते येथे आले. न्याययंत्रणेत त्यांचा चांगला संपर्क आहे. काहीतरी चांगलं होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑगस्ट २०१३ मध्ये जोधपूर पोलिसांनी आसारामला अटक केली होती. त्यानंतर चार वर्षांपासून आसाराम कैदेत आहेत. अनेकवेळा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर अनेक महिला समोर आल्या व त्यांनी आसारामबापूवर बलात्काराचा आरोप केला होता. आसारामचा मुलगा नारायण साईलाही बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात डांबण्यात आले होते.