महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय परिवारातून असलेला अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. रितेशचे वडील कै. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या पर्यायाने देशाच्या राजकारणात मोठे स्थान होते. राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या विरासराव यांचा लाडका असलेल्या रितेशला लहानपणापासूनच अभिनेता बनायचे होते. रितेशने त्याचे फिल्मी करिअर २००३ मध्ये आलेल्या विजय भास्कर यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून सुरू केले. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की, रितेशने त्याच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून केली होती.
मुंबई येथील कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथून रितेशने आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एका विदेशी आर्किटेक्ट फर्मशी जुडल्यानंतर त्याने एक वर्ष प्रॅक्टिस केली. पुढे चित्रपटात अभिनय करताना आणि फिल्म कंपनीबरोबर काम करताना रितेश एक आर्किटेक्चरल अॅण्ड इंटीरिअर डिझायनिंग फर्म इव्होल्यूशन्सही चालवित होता. रितेश एक दशकापेक्षा अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. रितेशला मल्टी स्टारर चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याने आतापर्यंत ‘ग्रॅण्ड मस्ती, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, हाउसफुल-२, हाउसफुल ३, बॅँगिस्तान, क्या कूल है हम, डबल धमाल, जाने कहॉ से आई है, अलादीन, अपना सपना मनी मनी, एक विलेन’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
रितेशने बॉलिवूडमधीलच आपली जीवनसंगिनी निवडली असून, पहिल्याच चित्रपटात एकत्र काम करणारी अभिनेत्री जेनेलिया डिसूझासोबत लग्न केले. रितेशनने २०१३ मध्ये ‘बालक पालन’ या चित्रपटाची निर्मिती करताना स्वत:चे प्रॉडक्शन हाउस सुरू केले. ‘बालक-पालक’ या चित्रपटाला विविध पुरस्कारांनी त्यावेळी सन्मानित करण्यात आले. रितेशने याच वर्षी सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये ‘वीर मराठी क्रिकेट टीम’ हा स्वत:चा संघही लॉन्च केला. या संघाचे सहमालक म्हणून रितेशचा भाऊ धीरज देशमुख आहे. तर त्याची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा आहे.
रितेशने २ फेब्रुवारी २०१२ मध्ये जेनेलियाशी लग्न केले. इसाई परिवाराशी संबंधित असलेली जेनेलिया आणि हिंदू परिवाराशी संबंधित असलेल्या रितेशचे लग्न हिंदू आणि इसाई पद्धतीने पार पडले. या दाम्पत्याला २५ नोव्हेंबर २०१४ रोजी मुलगा झाला. त्यानंतर १ जून २०१६ ला दुसराही मुलगाच झाला. रितेश आणि जेनेलिया पहिल्यांदा २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून एकत्र आले होते. या दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती. सुरुवातीला रितेश-जेनेलियाच्या लग्नाला विलासराव यांची परवानगी नव्हती, मात्र नंतर त्यांनीही परवानगी दिली होती.