मुंबई: पावसाळा महिनाभर लांबल्याने थंडीचं आगमनही लांबलंय. मात्र आता वातावरण अनुकूल असल्यानं उत्तरेतून वाहणारा थंड वारा वेगाने पुढे सरकत असून येत्या चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतेक भागात थंडी वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त केला.
पुढच्या चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांत तापमानाचा पारा खाली घसरणार असून हुडहुडी जाणवायला लागेल असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला. मोसमी पाऊस राज्यातून परतल्यानंतर अवकाळी पावसाचं आगमन झालं. सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली. दरवर्षी या काळात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पारा चांगलाच खाली येतो. सध्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असल्याने त्याचाही परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार आहे. काश्मीरप्रमाणेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेतल्या थंडीचं प्रमाणही वाढणार आहे.