कोलंबो: जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कँडी शहरात बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली सुरु असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
मागच्या वर्षभरापासून श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये वाढणाऱ्या तणावाने आता दंगलीचे स्वरुप घेतले आहे. श्रीलंकेत काही मुस्लिम संघटना नागरिकांना जबरदस्तीने धर्मांतराला भाग पाडत आहेत तसेच प्राचीन बौद्ध स्थळांची नासधूस करण्यात येत असल्याचा आरोप श्रीलंकेतील कट्टरपंथीय बौद्ध संघटनांकडून करण्यात येत होता. त्याच खदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ही ठिणगी पडली.