आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव होण्याची भिती असल्याने मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्यामुळे भाजपाची मोठी गोची झाली. भाजपाने शिवसेनेला सोबत घेण्यासाठी अजूनही इशारे सुरुच ठेवले आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मैदानात स्वबळावर लढण्याचा पक्का निर्णय घेतलेला आहे. पराभवाच्या भितीपोटी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत अमित शहा यांची मंगळवारी दुपारी भेट घेऊन पक्षाचे दुखणे मांडले. परंतु उध्दव ठाकरे तरी भाजपा सोबत जाणार नाही हे ठाकरे यांच्या विधानावरुन सध्या तरी वाटते. शिवसेना कोणत्याहीक्षणी राज्यातील सरकारचा पाठिंबा काढू शकते अशी परिस्थिती राज्यात येऊन ठेपली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका या सत्ताधाऱ्यांसाठी ‘फिल गुड’ राहणार नाही. भाजपाच्या वरिष्ठांची चिंता वाढलेली आहे. दररोज भाजपाचे मंत्री,संघाचे पदाधिकारी काही ना काही वादग्रस्त विधान करुन वातावरण दुषीत करण्याचे काम करत आहेत. देशातील शांतता भंग करण्याचा प्रकार करत आहेत. तर दुसरीकडे सत्तेतील मित्र पक्ष व विरोधक भाजपाला घेरण्याचा काम करुन त्यांच्या चुकांवर बोट ठेवून त्यांना सळो की पळो करुन सोडत आहे. मात्र ठिम्म सरकार काही न ऐकण्यास तयार आहे. सरकार बहिऱ्याचा सोंग करत आहेत. सर्व क्षेत्रात सरकार बद्दल नाराजीचा सुर उमटत असल्यामुळे नवनवीन खेळी खेळली जात आहे. आज राज्यातील परिस्थिती अत्यंत भयानक असल्यामुळे मुख्य मुद्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी आगाऊ उद्योग सरकारकडून चालवले जाता आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर प्रचंड नाराज असून ज्या पध्दतीने त्यांना साईड लाईन करण्यात आले त्यामुळे ते कोणत्याहीक्षणी पक्षाला राम राम करु शकतात. दुसरीकडे भाजपाचे काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी सरकारच्या विरोधात दंड धोपटले. आजच त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. वरिष्ठ पातळीवर काही वेगळी परिस्थिती नसून हेच चित्र आहे. भाजपाला विरोधकांशी तर दोन हात करावे लागणार आहेत परंतु त्यापेक्षाही अंतर्गत वाद आणि कुजबूज आहे ती दुर करावी लागणार आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष आघाडी करुन निवडणूका लढणार असल्यामुळे भाजपाची सुध्दा पंचाईत झाली. शिवसेना सत्तेची फळ चाखून दररोज आक्रमक होत आहेत. जणू शिवसेनेलाच जनतेचा आणि शेतकऱ्याचा कळवळा आहे अशा तोऱ्यात वावरत आहे. परंतु जनता ही दुधखुळी नाही. शिवसेनेचे राजकारण सध्या चिल्लर झालेले आहे. या सर्व परिस्थितीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व भाजपाचे प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाला सावरण्याचे जे काही कथन मांडले आणि शहांनी त्यांना मार्ग काढण्याचे आश्वास दिले तरी सुध्दा भाजपाला घाम फुटलेला आहे ऐवढे मात्र नक्की!
वैदेही ताम्हण
मुख्य संपादक