पार्टी वुईथ डिफरंस सांगणारा भाजपा पक्ष तंतोतंत खरं ठरलयं! याला निमित्त आहे विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचे!! भाजपामध्ये राष्ट्रवादीतून आलेले धनदांडगे नेते ‘प्रसाद लाड’ यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाचे १९८० पासून काम करणारे कार्यकर्ते माधव भंडारी यांना डावलुन उपरे उमदेवार लाड यांना भाजपाने उमदेवारी देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत नाराज झाले आहेत. यापूर्वी भंडारी यांना संधी आली होती पंरतु ती संधी मनसेमधून आलेले मुंबै बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना देण्यात आली होती. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देतांना विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. स्वाभीमानी पक्षाची स्थापना करुन भाजपाच्या तंबूत जाऊन बसले. राणे यांना भाजपाच्या टेकूवर पुन्हा विधान परिषदेत एंट्री करायची होती मात्र शिवसेनेने त्यामध्ये खोडा टाकल्याने राणे यांचे स्वप्न धुळीस मिळाले. भाजपाकडून माधव भंडारी, किंवा शायना एन.सी यांना उमदेवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु भाजपाने यांना चकवा देत प्रसाद लाड सारख्या तगड्या उमदेवाराला उमेदवारी दिली. भाजपाचे ही काही पहिली वेळ नाही. भाजपाने यापूर्वी अजय काकडे,अजय संचेती सारख्या धनदांडग्यांना उमेदवारी दिली होती. सध्या गुजरात विधानसभेमध्येही भाजपाने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून धनदांडग्यांना उमेदवारी दिली. लाड सारखा उमेदवाराचा महापालिकेच्या निवडणूकीच्या वेळीही भाजपाला मोठा आर्थिक मदत मिळाली होती पुढेही भाजपाला आर्थिक मदत मिळत राहावी यासाठी लाड यांना उमेदवारी देऊन त्यांचे लाड पूर्ण करण्यात आले. लाड यांनी मातोश्रीवर जाऊनही बंद दाराआड चर्चा केली. परंतु ती चर्चेच्या पलीकडेही काही घडलयं असल्याचा आरोप होत आहे. परंतु एक प्रश्न अनुत्तरीत राहतो की, पक्षामध्ये ज्यांचे आयुष्य चालले त्या कार्यकर्त्यांना डावलून भाजपा उपऱ्यांना संधी देत असेल तर निष्ठावंतांनी काय करावे असा सूर भाजपामधून निघत आहे. पक्षाची बाजू मांडणारे,अभ्यासू नेत्यांवर पक्षाकडून एका प्रकारे अन्याय झाल्याचे सध्याच्या उमेदवारीवरुन स्पष्ट होत आहे. तसेच भाजपामध्येही धनदांडग्यांनाच किंमत असल्याने हेच का पार्टी वुईथ डिफरंस हे स्पष्ट होते.