Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसत्तेसाठी विनाशाकडे नेणारे लुचाड!

सत्तेसाठी विनाशाकडे नेणारे लुचाड!

एका राज्याच्या निवडणूका जिंकण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्तापिपासू त्यांचे बगलबच्चे किती खालच्या स्तरावर जाऊ शकतात याचा अनुभव सर्वच देशातील नागरिक घेत आहेत. ‘गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे आणि तो करण्याविषयी त्याच्या लष्करी अधिका-यांची काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हजर होते’ असा बिनबुडाचा आरोप मोदींनी केला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर अहमद पटेल यांना आणावे असे त्यावेळी पाकिस्तानने सुचविल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. मनमोहनसिंग या स्वच्छ व धवल प्रतिमेच्या नेत्यावर असा आरोप करणे हीच देशाचा संताप वाढविणारी बाब आहे. मनमोहनसिंग हे केवळ जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञच नाहीत, देशातील सर्व जातीधर्मांच्या व वर्गांच्या लोकांना कमालीचे आदरणीय वाटणारे नेते आहेत. हा नेता गुजरात या राज्यातील निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पाकिस्तानची मदत घेईल व त्यासाठी तो मणिशंकर यांच्या घरी जाईल हा आरोप नुसता हास्यास्पदच नाही तर मोदींच्या अकलेची कीव करावी असा आहे. तशीही त्यांची जीभ सैल असून संयम सुटला आहे. ज्या बैठकीत हे झाल्याचे मोदी म्हणतात तिला देशाचे सेनाप्रमुख दीपक कपूर, माजी उच्चायुक्त राघवन, परराष्ट्र मंत्री नटवरसिंग यांच्यासह परराष्ट्र विभागाचे अनेक अधिकारीही उपस्थितीत होते. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला शत्रूशी बोलणी करावी लागतच असतात. (मोदीही शरीफ यांच्या घरच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून सामील होतेच) देशाचे संरक्षण व परराष्ट्र व्यवहार या संदर्भात उभय देशांच्या नेत्यांना परस्परांशी बोलावेच लागते. मात्र मनमोहनसिंगांच्या उंचीचा नेता अशावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची गोष्ट काढून त्यात पाकिस्तानची साथ मागेल असे म्हणणे हा शुद्ध वेडाचाराचा पुरावा आहे. मनमोहनसिंग हे कधीही न संतापणारे पुढारी आहेत. मात्र या आरोपाने त्यांच्याही अंगाचा तीळपापड झाला आहे. त्यांनी मोदींना फार धुवून टाकून त्यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे. मोदींसारखी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर येतात हाच मुळी देशाचा अपमान आहे असे ते म्हणाले आहेत. वास्तव हे की मोदींजवळ सांगण्यासारखे काही उरले नाही. गेली २२ वर्षे गुजरातच्या जनतेला तेच ते ऐकविल्याने तेथील जनताही त्यांच्या भाषणांना कंटाळली. त्यांनी सांगितलेला विकास लोकांना दिसत नाही या स्थितीत कोणतीही खोटीनाटी वक्तव्ये करणे व काँग्रेसला बदनाम करणे एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. त्यांना हार्दिकला नावे ठेवता येत नाही. जिग्नेशविषयी ते बोलत नाहीत आणि इतरांचीही नावे ते घेत नाही. राहुल त्यांना पुरून उरले आहेत आणि सोनियाजींवर आरोप केला तर तो आपल्यावरच उलटेल याची मोदींना भीती आहे. मनमोहनसिंगांची प्रतिमा एका सभ्य, सोज्वळ मितभाषी व संयमी नेत्याची आहे. त्यामुळेच मोदींना मनमोहनसिंगांना आपले लक्ष्य बनवावेसे वाटले असणार. पण मनमोहनसिंग हे एकटेच नव्हे तर देशातील सामान्य माणसेही त्यांच्या या अक्षम्य आरोपामुळे जशी संतापलेली दिसली ते पाहता लोकांनीच मोदींच्या वेडाचारावर शिक्कामोर्तब केल्याचे वाटू लागले आहे. लोकशाही हे सभ्यपणाचे व विवेकाचे राजकारण आहे. मात्र मोदींसारखी माणसे ते कलंकित करण्याचा चंग बांधायला निघाली असतील तर त्याची संभावना देशाचे नेते म्हणून न करता विनाशाचे नेते म्हणूनच केली पाहिजे. सोनिया गांधी, राहुल गांधी व डॉ. मनमोहनसिंग यासारख्या नेत्यांवर कोणताही आरोप लावता येत नाही आणि लावला तरी तो त्यांना चिकटत नाही. असे आरोप करणारी माणसेच मग लोकांना वाचाळ वाटू लागतात. सत्ता टीकवण्यासाठी निराधार आणि जनतेला भ्रमित करुन व्देष निर्माण करणे संतापजनक प्रकार आहे. जनतेने चुकीच्या गोष्टी वेळेवर ओळखने गरजेचे आहे. अन्यथा देशासाठी ते धोक्याचे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments