मुंबई : पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू. मात्र, विरोधातील आवाज दाबण्याचं काम आम्ही कधी करणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊत काम करू. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज बुधवारी पार पडत असून त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे सकाळीच विधानभवनात दाखल झाल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांनी ऐक्य दाखवलं याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या मनातही संघर्ष सुरु होता. त्यांची मनस्थिती मी समजू शकते. मी आमदारांचं स्वागत करण्यासाठी आले आहे.
आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हानं आहेत. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. पुढील पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र निर्माण करु. त्यासाठी जे लागतील ते कष्ट करु, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा ही एकच गोष्ट आमच्या मनात आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं.