बारामती: दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. मारहाण करणाऱ्यांची चौकशीचा मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाबाबत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपच्या कार्यकाळातील पाच वर्षातील गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्याने विरोधक नागपूरच्या अधिवेशनात गोंधळ घालत आहेत, असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.
बारामती येथील रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी आज मंगळवारी (17 डिसेंबर) पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ग्रंथालयं हे शांततेचं ठिकाण आहे. मात्र दिल्लीत ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला. दिल्लीत झालेला हिंसाचार हा देशाच्या गृह मंत्रालयाचं मोठं अपयश आहे.
दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. आपण प्रथमच देशात एवढा अत्याचार पाहिला असून देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची आणि मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
एकीकडे, देशासमोर अनेक प्रश्न उभे असताना त्यांच्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना केंद्रातले सत्ताधारी आणि राज्यातले विरोधक नको त्या विषयांना महत्त्व देऊन जनतेचं अन्यत्र लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्यातल्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आहे. त्यामध्ये चांगली चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, विरोधकांकडून कोणतीही चर्चा न करता गोंधळ घातला जात आहे. मागील पाच वर्षात त्यांनी केलेल्या गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्यामुळे त्यांच्याकडून गोंधळ घातला जातो आहे काय? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.