मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली आहे. अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हावा असा दावा कधीही राष्ट्रवादीने किंवा काँग्रेसने केला नाही. असेही काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार यात कोणतीही शंका नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार राज्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे, असं ठाकरे म्हणाले.
तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सत्तास्थापन करण्यासंदर्भात अंतिम चर्चा होणार आहे. आज संध्याकाळीच सत्तास्थापन करण्याचा दावा केला जाणार नाही. मात्र, कधी करायचा यासंदर्भात निर्णय होऊ शकतो, असं ठाकरे म्हणाले.