मुंबई : राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल पहिली यादी उद्या सोमवारी जाहीर होईल अशी घोषणा केली. ही यादी सुरवातीला मर्यादित स्वरूपात करतो, दुसरी यादी २८ फेब्रुवारीला येईल. येत्या ३ महिन्यांचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करु असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रविवारी जाहीर केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीचं सरकार हे कन्फ्यूज्ड सरकार असल्याची टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नसून, केवळ स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ”महाविकास आघाडी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काम सुरू केलं आहे. हे विरोधकांनी हे डोळे उघडे ठेवून बघावं, त्यांचं वय ६ ते १८ वर्ष असतं तर त्यांनाही चष्मे दिले असते,” असा टोला ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.
पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविषयी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ”विरोधी पक्षानं त्यांची भूमिका नीट वटवायला हवी. सरकार काही करत नाही, ही भूमिका चुकीची आहे. त्यांच्या काही व्यथा असतील, त्यांनी सरकारला सांगाव्यात. केवळ विरोधक आहोत म्हणून वारेमाप आरोप करणं चुकीचं आहे, असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना दिला. एल्गार परिषदेचा तपास मी एनआयएकडे दिला नाही. केंद्राने स्वत: अधिकारात तपास घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिली आहे. एनपीआरवर समिती गठीत करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. गिरणी कामगारांच्या घराची १ मार्चला लॉटरी निघणार असल्याचे जाहीर केले.
“एल्गार परिषदेचा तपास मी दिलेला नाही आहे, केंद्राने तो त्यांच्या अधिकारात घेतला आहे. जरूर त्याबद्दल आमची नाराजी आहेच कारण याचा अर्थ असा की तुम्ही राज्याच्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवतात.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/F2ifFwlG4U— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 23, 2020
काय म्हणाले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…
मला अशी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने एका समर्थ विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे. विरोधी पक्ष आहे म्हणून सरकारवर वारेमाप आरोप केले म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका आपण पार पाडली हे योग्य नाही आहे.
“जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की शेतकऱ्यांना ज्यांच पीक कर्ज २ लाखांपर्यंतचे आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करतो याचा मला आनंद आहे.”
“शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल पहिली यादी उद्या जाहीर होईल. ही यादी सुरवातीला मर्यादित स्वरूपात करतो. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला येईल. येत्या ३ महिन्यांचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू.”
“शिवभोजन योजना सुरू केलेली आहे, त्यावर सुध्धा टीका केली गेली. एकूणच स्वतः काही करायचं नाही आणि हे सरकार काही चांगल करत असेल तर ते अयोग्य कसं हे दाखवण्याचा प्रयत्न ही पोटदुखी आहे.”
“आजच बैठक होती ती गिरणी कामगारांच्या घरांसाठी. त्याची पहिली लॉटरी १ मार्च रोजी निघणार आहे. त्यानंतर सुद्धा जितके गिरणी कामगार आहेत त्यांना जे आमचे वचन होते की गिरणी कामगारांना घरे, ती योजना सुद्धा हे सरकार प्रभावीपणे राबवत आहे आणि त्या सर्व गिरणी कामगारांना हे सरकार घरे देईल.”
किंबहुना दिल्लीमध्ये गृहखाते केंद्र सरकारकडे आहे तिथे सुद्धा शाहीन बाग सारखं आंदोलन ६० दिवसांपासून सुरू आहे. युपी मध्ये तर दंगे झालेले आहेत.”