मुंबई : मंत्रीपदापासून हुलकावणी मिळाल्यामुळे गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खासदार विनायक राऊत हे जाधव यांची शुक्रवारी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी जाधवांना फोन केला अशी माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधले होते. जाधव हे जुने शिवसैनिक असून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आघाडीची सत्ता असताना मंत्रीपदही भोगले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर कामही केले होते. मात्र २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीपदावर डोळा ठेवून राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. मात्र, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाआघाडीनंतर जाधव यांना मंत्रीपदापासून हुलकावणी मिळाली. त्यामुळे सध्या जाधव नाराज आहेत. त्यांची नाराजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या कोकण दौ-याच्या वेळी दिसून आली. त्यामुळे जाधव यांची नाराजी दूर करण्यात कितपत यश मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.