मुंबई : तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. अखेर आज गुरुवार (२२ जानेवारी) मनसेचं महाअधिवेशन सुरु असताना नरेंद्र पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनसेला धक्का बसला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर धुळ्यातून पाटील यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर केवळ चारच महिन्यांत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शेतकरी स्व. धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र धर्मा पाटील यांनी आज, माझ्या उपस्थितीत @NCPspeaks पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री @Jayant_R_Patil हेदेखील उपस्थित होते. pic.twitter.com/7lE2TA5DPu
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2020
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नरेंद्र पाटील यांनी प्रवेश केला. मात्र मुंबईत मनसेचे राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु असताना नरेंद्र पाटील यांच्या सोडचिठ्ठी चर्चा सुरु आहे.
धर्मा पाटील यांच्याबद्दल जाणून घेऊ या…
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात धर्मा पाटील या ८० वर्षांच्या शेतकऱ्याने जमीन अधिग्रहणात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार खेटे घातले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट मंत्रालय गाठलं आणि तिथं विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
यानंतर, भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी विखरण गावातील मोबाईल टॉवर चढून आत्महत्येचा इशाराही दिला होता. दरम्यान, त्यांनी आपल्या आईसह तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात आंदोलनही छेडले होते.