मुंबई : राम मंदिर ही भाजपची मक्तेदारी नाही. अयोध्येला जाणं हा श्रध्देचा विषय आहे. आम्ही नेहमीच जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा पंढरपूरच्या वारीसारखा आहे. वारीमध्ये जात, धर्म नसतो, तशीच ही अयोध्येची वारी आहे. असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सुध्दा सर्व मंदिरात जातात. न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,राहुल गांधी व इतर काँग्रेस नेत्यांनीही त्याचं स्वागतं केलं होतं. अयोध्येला जाताना घटकपक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सहभागी व्हावे. घटकपक्षाचे नेते येणार असतील, तर त्यांना सुद्धा घेऊन जाऊ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
मनसेची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, त्या अनुषंगाने बोलताना संजय राऊत म्हणाले, काही पक्षांविषयी माहिती नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर, विचारांवर ठाम आहे. हिंदुत्व हा टक्कर देण्याचा विषय असू शकत नाही असे राऊत म्हणाले. सत्ता येते जाते. पाय जमिनाीवर ठेवायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं.
बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे. जगज्जेते कोणात्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले लोकांना गोळा करुन प्रेरणा दिली आजही शिवसेना त्याच मार्गावरुन पुढे जातेय असे राऊत म्हणाले. जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होतं तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटूंदे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही असे संजय राऊत यांनी सांगितले.