औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. रिपब्लिकन सेनेच्यावतीने आंबेडकरी जनतेला एकत्र करुन सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही पक्षाची नव्याने बांधणी करत आहोत. ‘गाव तिथं, रिपब्लिकन सेना, घर तिथं रिपब्लिकन सैनिक’ अशी उभारणी आम्ही करणार आहोत, असंही आंबेडकर यांनी नमूद केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आनंदराज आंबेडकर आज मंगळवार ( १४ जानेवारी ) औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं.
आंबेडकरी समाजात नैराश्य आलं…
आनंदराज आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हाही प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.”
वंचितला पर्याय उभं करणार…
रिपब्लिकन सेना औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढणार असल्याचीही घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी केली. रिपब्लिकन सेनेने उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे. त्यामुळे वंचित विरूध्द रिपब्लिकन सेना असा सामना रंगतांना दिसणार आहे.